वाचक लिहितात   

अन्नातील भेसळ अविभाज्य घटक
 
भारतात विकल्या जाणार्‍या अन्न पदार्थांमध्ये सर्रासपणे भेसळ केली जात असते. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणे हा अक्षम्य गुन्हा असून तसे गुन्हे करणार्‍यांना मोठ्या शिक्षेची तरतूद आहे. भेसळीच्या गुन्ह्यांवर सजा केली असती, तर आज भेसळ करण्याचे प्रयत्न झाले नसते किंवा मंदावले असते. याबाबत आरोग्य आणि बाल कल्याण मंत्रालयाने सन २०२३-२४ मध्ये १७०,५१३ अन्न पदार्थांच्या चाचण्या घेतल्या, त्यातील ३३,८०८ पदार्थांत भेसळ असल्याचे निष्पन्न झाले. अशाच प्रकारच्या भेसळींमुळे भारत देश तिसर्‍या क्रमांकावर असून प्रत्यक्ष आणखी कुठे, कशा प्रकारे भेसळ केली जाते हे समजणे कठीण होऊन बसते. भारतात कायद्यांत शिक्षांची तरतूद असूनही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्य तेल, मसाले यांमध्ये सातत्याने भेसळ केली जाते. बाजारांत विकल्या जाणार्‍या हळद पावडर, चहा पावडर, मिरची पावडर खरीदल्यावर जाणकारांना त्यात केलेल्या भेसळीची जाण तात्काळ समजून येते. पनीर, खवा भेसळीशिवाय विकलेच जात नाही. सणासुदीच्या दिवसांत मिठाई भेसळ करूनच विकली जाते. भेसळ तपासणी करणार्‍या फूड सेफ्टी ऑन व्हिल्स नामक अन्न पदार्थांच्या फिरत्या तपासणी करणार्‍या प्रयोगाशाळा-गाड्या नियुक्त केल्या आहेत. भेसळ तपासणी करणार्‍या प्रयोगशाळा, यंत्रणामधूनच भेसळीचे साठे पकडल्याचे दावे करतात आणि आपले अस्तित्व कायम असल्याचे दाखवीत असतात. भेसळयुक्त पदार्थ विकणार्‍यांना जशी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी नसते, त्याचप्रमाणे तपास यंत्रणा त्यांच्या कर्तव्यात गाफील असतात.
 
स्नेहा राज, गोरेगांव.
 
पावसाचे पाणी वाया घालवू नका
 
भारतीय हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी देखील लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गेल्या काही वर्षात राज्यात अपुरा पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. पावसाच्या जास्तीत जास्त पाण्याची बचत कशी होईल, याचे नियोजन आतापासूनच व्हायला हवे.
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे.
 
‘मोबाइल बंद’चा उपक्रम
 
एकवेळ जेवण नको पण मोबाईल हवा इतकी सवय लागून गेलेल्या लोकांना थोडा का वेळ असेना मात्र यापासून परावृत करण्यात उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडीला यश आले असून त्याचा सर्वांना फायदा झाला आहे गेल्या तीन वर्षांपासून गावात सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा झाली आहे. या उपक्रमामुळे गावकर्‍यांचा संवाद वाढला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे गेल्या तीन वर्षांपासून गावात मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीचा भोंगा वाजला की, दररोज सायंकाळी सहा ते आठपर्यंत ही साधने बंद राहत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही झाला आहे. घरोघर टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरतात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झाली आहे. सुरुवातीला कुतूहल म्हणून लहान मुलांच्या हातात दिलेला मोबाईल त्यांच्या सवयीचा भाग बनला आहे. 
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  
 
नारीशक्तीला सलाम
 
संयम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय महिला अनेक क्षेत्रांत आज अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. समस्त भारतीयांची मान गर्वाने उंचावेल अशी उत्तुंग भरारी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या २९ वर्षीय छोनझीन अनाग्मो या अंध तरुणीने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला. अंधत्व असूनही तिने हार मानली नाही आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने हे विश्वविक्रमी यश मिळवले. असा पराक्रम करणारी ती जगातील केवळ पाचवी महिला ठरली आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
वाहनांच्या हेडलाईटमुळे अपघात
 
सध्या वाढती वाहन संख्या ही मोठी गहन समस्या बनली आहे. त्यात कुठलेही चारचाकी वाहन असो, की दुचाकी वाहन असो रात्रीच्या वेळी त्याच्या प्रखर प्रकाशातील झोतामुळे समोरच्या गाडी चालकाच्या डोळ्यांवर प्रकाश पडतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवणे अवघड होते. पादचार्‍यांना गाडीचा अंदाज घेता येत नाही. त्यामुळे रस्ता ओलंडणेही अवघड झाले आहे? ज्येष्ठ नागरिकांना तर तारेवरची अवघड कसरत करावी लागत आहे. पूर्वी चारचाकी, दुचाकी वाहनांना गाडीच्या हेड लॅम्पवर काळा मोठा डॉट असायचा, त्यामुळे समोरच्या वाहनचालकांना, पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे व प्रवास करणे सोपे जायचे. आत्ताच्या गाड्यांच्या प्रखर प्रकाशामुळे वाहन चालकांना व पादचार्‍यांना यामुळे अपघात, अपंगतत्व, जीवितहानी अनुचित प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गाड्यांच्या हेडलॅम्पवर काळा डॉट असणे, मारणे सक्तीचे करावे. त्यामुळे अनुचित प्रकार, जीवितहानी आणि अपंगतत्व हे प्रकार नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
 
अनिल अगावणे, पुणे.
 
निवडणूक आयोगाने पक्षपाती असू नये
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून ते निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाची एकूणच निर्णयप्रक्रिया संशयास्पद आणि कार्यपद्धती ’केंद्रात आणि राज्यांत डबल इंजिन’चेच सरकार हवे, असा आग्रह धरणार्‍या केंद्रातील मोदी सरकार प्रति धार्जिणे राहिल्याचे सप्रमाण दाखवता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दरम्यान निवडणूक आयोगाची सत्ताशरणता तर ढळढळीतपणे दिसून आली. निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या प्रचारगीतातून ’हिंदू’ आणि ’भवानी’ हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले; परंतु महायुतीच्या प्रचारकाळातील ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’ या ध्रुवीकरणाच्या प्रचाराकडे मात्र निवडणूक आयोगाने सोईस्करपणे आणि सपशेल दुर्लक्ष केले.
 
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेले, तरी देखील निवडणूक आयोगाने ’आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग’ अंतर्गत त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सकाळी सात ते संध्याकाळी सहा ही मतदानाची वेळ असतानाही रात्री ११ वाजेपर्यंत मतदान चालू ठेवल्याचे प्रकार कित्येक ठिकाणी घडले. म्हणजे मतदानासाठी सकाळी सहा वाजता मतदारांची इतकी मोठी रांग होती का? की ती रात्री ११ पर्यंत संपली नाही? त्यातही अनेक ठिकाणी सायंकाळी ५ ते ११ या वेळेत पाच ते सात टक्क्यांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. राहुल गांधी यांनी देखील मुख्यत्वे याच वाढीव आकडेवारीबाबत सुरूवातीपासूनच शंका उपस्थित केली आहे.
 
निवडणूक आयोगाकडून मतदानाची जी टक्केवारी सांगितली जाते ते आकडे आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यातही अनेक ठिकाणी तफावत आढळते. निवडणूक आयोगाची पक्षपाती कार्यपद्धती पासून ते ईव्हीएम मशीन, एकूणच निवडणूक प्रक्रियेपासून मतमोजणीपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ’इलेक्ट्रोलर डिमोक्रसी’ असलेल्या भारतासारख्या देशात लोकशाही ही निवडणूक प्रक्रियेतून पुर्नप्रस्थापित आणि अधिकाधिक प्रगल्भ होत असते. लोकशाही व्यवस्थेत स्वायत्त म्हणवणार्‍या संस्थांची - नियामक मंडळांची स्वायत्तता कृतीतून दिसणे गरजेचे असते; परंतु आज या स्वायत्त म्हणवणार्‍या संस्था इतक्या सत्ताशरण झालेल्या दिसतात, की ’वाक म्हणता लोटांगण’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. यातही निवडणूक आयोग कसा नसावा याचा वस्तुपाठच जणू वर्तमान निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. 
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 

Related Articles